हा पुरस्कार म्हणजे नंदुरबार जिल्हा आणि खान्देशवासियांसाठी गौरवाचा क्षण मानला जात आहे. राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्यावतीने उत्कृष्ट आमदार म्हणून उत्कृष्ट भाषण या विभागात हा पुरस्कार आ.पाडवी यांना सन २०२३-२४ करीता देण्यात आला आहे.
जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. या पुरस्कारामुळे अक्कलकुवा तालुक्यासह जिल्हयात आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.अक्कलकुवा येथे भव्य मिरवणूक काढली व आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी विधीमंडळाच्या कामकाजात सातत्याने प्रयत्नशील राहून उत्कृष्ट कामकाज केल्याबद्दल आमदार आमशादादा पाडवी यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उत्कृष्ट आमदार म्हणून पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. मंगळवार दि. ३ सप्टेंबर २०२४ रोजी मुंबई येथे महाराष्ट्र विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात पुरस्कार वितरणाचा दिखामदार सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
महाराष्ट्र विधानसभा उत्कृष्ट भाषण या विभागात पुरस्कार देवून आ.पाडवी यांचा गौरव करण्यात आला.दांडगा जनसंपर्क, विकास कामांची धडाडी आणि जनसामान्यासाठी संघर्ष करणे, आदिवासींच्या प्रश्नांची जाण आणी हक्कांविषयी जागृतपणे जिल्ह्यात समर्थपणे काम सांभाळत आहेत. विधानभवनातील विविध संसदीय आयुधांचा अभ्यासपूर्ण वापर करुन आदिवासींसाठी सिंचन, कृषी, आरोग्य, शिक्षण, रस्ते तसेच गावातील मुलभूत विकासाला गती मिळाली. ग्रामीणमधील जनतेसह राज्यातील सर्वसामान्यांचा आवाज आ. आमश्या पाडवी यांनी विधानपरिषदेत बुलंद केला आहे. कौशल्याची चूणुक त्यांनी दाखवली.
राज्यातील आणि मतदारसंघातील प्रश्न अभ्यासपूर्ण भाषणातून जनतेचे प्रश्न प्रभावीपणे मांडल्यामुळे आ. आमश्या पाडवी यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते उत्कृष्ट आमदार म्हणून महाराष्ट्रात पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी झालेल्या सन्मान सोहळ्याला राष्ट्रपतींसोबत महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. अजित पवार,उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस,विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर विधान परीषद उपसभापती नीलम गोरे,विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ,विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे,संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. पुरस्कार मिळल्याबद्दल तालुक्यासह जिल्हयात आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.